Saturday, September 8, 2018

महाराष्ट्राला एक नको तर अनेक "तुकाराम' हवेत


आजपर्यंत सदाशिव तिनईकर, गो.रा. खैरनार, अरुण भाटिया यांच्या सारखे धडाडीचे अधिकारी राज्याला लाभले. त्याच पंक्तीत तुकाराम मुंढेंचा समावेश करावा लागेल. हे आज नाशिकला आहेत उद्या जर मायबाप सरकारच्या मनी आले तर त्यांना गडचिरोलीलाही (शिक्षा म्हणून ) पाठविले जाईल. ते जातीलही आणि तेथेही ते जनतेचे "तुकाराम' म्हणूनच काम पाहतील. राज्याला म्हणूनच एक नको अनेक "तुकाराम' हवेत असे वाटते. 
देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड कधी संपणार ? हा प्रश्‍न गेल्या साठ वर्षापासून लोक विचारत आहेत. पण, कीड कोणी नष्ट करू शकली नाही. अद्याप या किडीचा नाश करणारी फवारणी निर्माण झाली नाही. सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराला अधिकारी आणि कर्मचारी जितके जबाबदार असतात. तितकेच जबाबदार राज्यकर्ते आणि आपणही असतो.
प्रशासनात सर्वच अधिकारी भ्रष्ट असतात असेही नाही. काही चांगल्या अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर लोकांचा विश्वास आहे. पैसे खाणार नाही आणि खाऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन उच्चपदावर काम करणारे असंख्य अधिकारी आहेत. त्यापैकीच एक नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे. 
यापूर्वीच्या कर्तबगार अधिकाऱ्यांनाही किंमत मोजावी लागली पण, आपल्या कर्तव्यापासून ते यत्किंचितही मागे हटले नाहीत. जनतेच्या हितासाठी काम करताना राज्यकर्त्यांचा रोष स्वीकारलेले खमके अधिकारीही प्रशासनात होऊन गेलेत. असे अधिकारी कधी दडपण घेऊन काम करण्याची शक्‍यता नसते.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बदलीला तर कधीच घाबरत नाही. बदली हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. सदैव बदलीसाठी ते तयार असतात त्यांनी बॅगा व सामान बांधून तयारच ठेवलेले असते. 
स्वच्छ आणि पारदर्शी कारभार पाहणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेहमीच स्मरणात राहातात. या ना त्या कारणाने ते आठवतही जातात. आदर्श आणि स्वच्छ अधिकारी अशी ओळख नाशिकचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांची झाली आहे. जेथे जेथे ते जातात तेथील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना धडकी का बसते हे कळत नाही ? लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत तर त्यांना कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना घाबरण्याचे कारण काय ?
जर लोकच त्यांना साथ देत असतील तर नेते मंडळींनी त्यांना कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी ते डगमगत नाहीत. मुळात असे अधिकारी चुकीचे काही करण्यास तयार नसतात. नियमात काम बसत असेल तर ते कधीच अडवणूक करीत नाहीत असाच सर्वसाधारण जनतेचा अनुभव असतो. भ्रष्ट आणि खादाड नेत्यांना असले अधिकारी जवळ उभे करीत नाहीत हेच त्यांचे दुखणे असते. 
सत्ताधारी असो की विरोधीबाकावरील नेते. त्यांना आपले ऐकणारा अधिकारी खूप प्रिय असतो. म्हणून सरकार बदलले की अधिकारीही बदलले जातात. आपल्या विश्वासातील अधिकाऱ्यांची नियुक्ती ते करीत असतात.
काळेगोरे म्हणून जे काही उद्योग असतात ते लपविण्याचे कौशल्य लाडके अधिकारी करीत असतात. त्यातूनच भ्रष्टाचार फोफावतो. जनतेच्या पैशावर सत्ताधारी आणि राज्यकर्ते उड्या मारतात. मात्र प्रामाणिक अधिकाऱ्यांना नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. अर्थसत्यमधील इन्स्पेक्‍टर वेलवणकर कुणालाच नको असतात. 
बदली करण्याचा अधिकार सरकारला असल्याने ते प्रामाणिक अधिकाऱ्यांना सारखे नाचवीत असतात. त्यामागे कारण असे असते की आपल्या नेत्यांना, पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारे अधिकारी जिल्ह्यात, तालुक्‍यात हवे असतात. कोणता "एसपी", जिल्हाधिकारी किंवा "पीआय' हवा हे स्थानिक आमदार ठरवितात.
काही वेळा असे चित्र पाहण्यास मिळते की तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही एखादा अधिकारी तेथेच राहतो. जोपर्यंत तेथील आमदाराची मर्जी आहे तोपर्यंत त्याला कोणी धक्काही लावत नाही. याचा काय अर्थ काढायचा ? मात्र जनता काही खुळी नसते. त्यांना सर्व समजत असते. 
मुंढे हे बीड जिल्ह्यातील ताडसौन्ना सारख्या खेड्यातून आले आहेत. प्रारंभी शिक्षक आणि त्यानंतर ते कलेक्‍टर बनले. सोलापूरचे जिल्हाधिकारी ते नाशिकचे आयुक्त असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 2005 पासून त्यांनी धडाकेबाज निर्णय घेऊन राज्यकर्त्यांसह भ्रष्ट मंडळींना धडा शिकविला आहे. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्‍टरांना निलंबित केले होते.
नागपुरात "सीईओ' असताना काही शिक्षक अधिवेशन पाहण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांनी पहिल्याच दिवशी शाळेला भेटी दिल्या असता शिक्षक जागेवर नव्हते. हे लक्षात येतात शिक्षकांना निलंबित केल्याने ते प्रकाशझोतात आले. पुण्यात "पीएमपीएमएल'चा कारभार सांभाळताना बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कुणाचाही मनमानी कारभार ते चालू देत नाहीत. शिस्तीचे भोक्ते असल्याने नेते, पुढारीऱ्यांना त्यांची धास्ती वाटते. 
कुठे मानापानाचे निमित्त करून तर कुठे अधिकाराचे मुद्दे निर्माण करून त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना विरोध होताना दिसतो आहे. मुंढे यांनीही सर्व गोष्टी आपल्या मनानुसार आणि नियामानुमसारच होणे शक्‍य नाही याचे भान राखावे.
चांगल्या अधिकाऱ्यांवर दडपण आले आणि दोन चार प्रकरणात त्याला न्याय देता आला नाही तरी तो शेकडो गोरगरिबांची कामे करू शकतो. त्यांना न्याय देऊ शकतो. रात्रीतून घडवू शकतो. त्यामुळे मुंढे यांनी 20:20 क्रिकेट सामन्यातील खेळाडूंची मानसिकता सोडून कसोटी क्रिकेटपटूंची मानसिकता धारण करावी. खेळपट्टीवर टिकून राहणेही महत्त्वाचे असते. धावा होऊ शकतात हे ही लक्षात घेण्याची गरज आहे. 
मुंढे यांच्या एकूणच कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात. शेवटी लोकप्रतिनिधींचा मानसन्मानही ठेवणे गरजे आहे. मात्र त्यांच्याकडून तसे होत नाही. ते लोकप्रतिनिधींना किंमत देत नाही अशी त्यांच्याविषयी तक्रार आहे. त्यामध्ये तथ्य असूही शकेल. त्यांच्यावर राजकीय पक्षाचे नेते कितीही आरोप करोत पण, ते "मिस्टर क्‍लीन' आहेत यावर लोकांचा विश्वास आहे. यातच सर्वकाही आले.  

मुली उचलायला, काय मोगलाई लागली आहे का ?

ज्यात किती सुंदर मुलींचे चेहरे ऍसिड हल्ल्यात विद्रूप झाले. हे चेहरे विद्रूप करणारे एकतर्फी प्रेम करणारे गुंड होते. सांगलीत दिवसाढवळ्या अमृता देशपांडेचा खून तर उल्हासनगरात रिंकू पाटीलला जीवंत जाळण्यात आले. या निष्पाप मुलींनी जीव वाचविण्यासाठी केलेला आक्रोश महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे "बेटी बचाव'चा नारा देतात आणि त्याच पक्षाचे आमदार राम कदम दुसरीकडे मुली उचलण्याची भाषा करतात ? यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय असू शकते. 
पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात आता कुठे महिलांना स्वातंत्र्य मिळाले. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या कुठे उंच भरारी घेता आहेत. आज असे कुठलेही क्षेत्र शिल्लक नाही की जेथे महिला नाही. सर्वत्र असे आशादायक चित्र असले तरी महिला आणि मुलींना एक स्त्री म्हणून आजही भोगावे लागते. अन्याय, अत्याचार सहन करावा लागतो. पुरुषी वर्चस्वाने ती दबलेली आणि पिचलेली आहे. 
आपण कितीही पुरोगामीत्वाच्या आणि सुधारणावादाच्या गप्पा मारत असलो तरी महिलांचे शोषण काही थांबलेले नाही. ते थांबेल असे वाटत नाही. स्त्री ही पुरुषाची दासी, गुलाम आहे ही विकृत मानसिकता आपल्या मनातून कधी निघणार नाही. राम कदम यांच्यासारखे वाचाळवीर आणि सामाजिक भान नसलेले बेजबाबदार नेते आपल्या अकलेचे तारे तोडतात. मुली पळवून आणण्याची भाषा करतात. अशा या भाजपच्या रामाचा निषेध करावा तितका कमीच आहे. माझी मुलगी उंबऱ्याबाहेर पडली तर ती सुरक्षित घरी येऊ शकते का ? अशा चिंतेत असलेल्या मायबापांना राम कदमांनी अधिक चिंतेत टाकले आहे. 
घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात कदम म्हणाले, की तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असं म्हणत मुक्ताफळे उधळली. कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले, की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा." वा रे वा बेट्या ! 
खरे तर दहीहंडी उत्सव हा विशेषत: तरुण-तरुणींचा. या उत्सवात आबालवृद्ध सहभागी होतात. जशी मुलं दहीहंडी फोडतात तसेच मुलीही कमी नाहीत. मुंबईतच नव्हे तर राज्यभर खास मुलींसाठीही दहीहंडी उत्सव होत असतात. याचाच अर्थ आपण समानतेने मुलामलींकडे पाहतो. हे वर्षानुवर्षे दहीहंडी उत्सव आयोजित करणाऱ्या कदमांनी लक्षात घेण्याची गरज होती. 
मुख्यमंत्री आले. बॉलिवूडसह मराठा तारका आल्या. कोट्यवधीची उधळण केली म्हणजे खूप शहाणे झालो. आपण काही बोललो तर लोक ते विनोदाने घेतात हा समज त्यांनी करून घेतलेला दिसतो. खरेतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान उपटण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनीही गोविंदा, गोपाळा म्हणत या उत्सवात सहभाग घेतला. ते कदमांच्या दहीहंडीलाही उपस्थित राहिले. पण, या उत्सवावर कदम यांनी पाणी फिरविले. त्यांनी उधळलेली मुक्ताफळे खरे तर भाजप सारख्या संस्कृती आणि परंपरेचा अभिमान सांगणाऱ्या पक्षातील नेत्यांनाही रुचला असेल वाटत नाही. 
सार्वजनिक जीवनात वावरत असताना सभ्यता बाळगावी लागते. शिवराळ बोलणे किंवा एखाद्याला शिव्याशाप देणे सोपे असते. पण, एक सुसंस्कृत नेते म्हणून वागणे, बोलणे किती अवघड असते हे कदमांना कोण सांगणार ? आपण खूप मोठे नेते आहोत. आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आहोत म्हणून आपण काहीही बोलले तर खपवून घेतले जाते असा जर कोणी समज-गैरसमज करून घेतला असेल तर त्यांनी तो डोक्‍यातून काढून टाकलेला बरा. 
कदम यांचे वादग्रस्त विधान संताप आणणारे का आहे ? याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण असे की, राज्यात कितीतरी सुंदर मुलींचे चेहरे ऍसिड हल्ल्यात विद्रूप झाले. हे चेहरे विद्रूप करणारे एकतर्फी प्रेमप्रकरणारे गुंड होते. सांगलीत अमृता देशपांडेचा, उल्हासनगरात रिंकू पाटील यांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. या निष्पाप मुलींनी जीव वाचविण्यासाठी केलेला आक्रोश महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. या घटनांनी समाजमन सुन्न झाले होते. 
कदम हे सार्वजनिक जीवनात आहेत त्यामुळे त्यांना या घटना कधी आठवत असतील किंवा त्यांना कोणी तरी आठवण करून देण्याची गरज आहे. हे सर्व का होते तर एकतर्फी प्रेमप्रकरणातून. टवाळखोर, मवाली आणि गुंडगिरी करणाऱ्या मुलांचा उच्चशिक्षित मुली कशा काय हात धरू शकतील ? एखादी मुलगी आवडली म्हणजे तिला मागण घालायचं. तिचा हात धरायचा. जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडायचे का ? 
आपल्या मुलीचे हात पिवळे करण्यापूर्वी तिचे आईबाबा आपला होणारा जावई कोणत्या संस्कृती वाढतो याचा विचार करतात. एखादी मुलगी डॉक्‍टर असेल आणि राम कदमांच्या एखाद्या टपोऱ्या कार्यकर्त्याला ती आवडली आणि मागणी घातली तर त्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून द्यायचे का ? जर त्या मुलीचे आईवडील नाही म्हणाले तर त्या मुलीचे अपहरण करणार का ? याचे उत्तरही कदम यांनी द्यायला हवे. 
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, अनुताई वाघ, तारा मोडक, गोदाबाई परुळेकर आदी रणरागिणींचा हा महाराष्ट्र. त्याच मराठी मुलुखात मुली उचलण्याची भाषा जर कोणी करीत असेल तर ती कदापि सहन करता कामा नये. कदम जेथे जातील तेथे महिलांनी त्यांना हिसका दाखविलाच हवा. म्हणजे पुढे कोणी अशी विधाने करताना धजावणार नाही. 
इतिहासात डोकावलं तर आपल्या लक्षात येईल की ज्यांनी वाणीवर संयम ठेवला, त्यांच्या चरित्राचे गायन आजही केले जाते. बोल कसे असावेत शांतीयुक्त,आदरयुक्त, स्नेहयुक्त. वाणीत जर सभ्यता असेल तरच तुमचे बोल हिरे व मोती पेक्षा अधिक मूल्यवान मानले जातील. म्हणून तोडणं अधिक सोप असतं आणि जोडणं खूप कठीण असतं. 
म्हणून आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाऊ नये ही सांभाळण्याची जबाबदारी राम कदम यांच्यासह आपल्या सर्वांचीच आहे. त्यासाठी एकाच गोष्टीची आवश्‍यक्ता असते ती बोलण्यावर, जीभेवर संयम !